Monday, March 13, 2017

प्रिय!


प्रिय मुलास,

वरच्या वाक्यात 'प्रिय' लिहीताना हात अडखळला. 'प्रिय' कोणास लिहावे याचे काही ठोकताळे माझ्या मनात आहेत. ज्या व्यक्तीला आपण अप्रिय तर झालो नाही ना, अशी शंका येते त्यालाच प्रिय लिहून आश्वस्त करावं असं माझं मत आहे. पण मुलाला प्रिय लिहीण्याचं काही कारण सापडेना. पण मग दुसरं काय लिहावं तेही सुचेना. मग शेवटी लिहीलंच आणि केली सुरुवात.

नमनालाच घडाभर तेल घालवून ही आज आपल्याला काय सांगणार आहे याची उत्सुकता तुला वाटत असेल. पत्राच्या या टप्प्यावर असलेले तुझे आश्चर्यमिश्रित कुतुहलमिश्रित उत्सुक भाव मला पत्र लिहीतानाच जाणवतायत. का नाही जाणवणार? आईला सग्ग्गळं कळत असतं. मुलाच्या भावनांपासून त्याच्या वेदनांपर्यंत. सगळं!

तुला आठवतंय? लहानपणी शाळेत असताना तू एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होतास. 'माझी आई' असा त्या निबंधाचा विषय होता. तू त्यात किमान २० वेळा 'माझी आई जगातली सर्वात चांगली आई आहे' अशा आशयाचं वाक्य लिहिलं होतंस. जेमतेम ३०-३५ ओळींच्या निबंधात २० वाक्यं हिच लिहील्यावर अर्थातच तुझा निबंध स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला होता. तुझा तो हरलेला चेहरा मला अजुनही आठवतो. माझी आई टिचरच्या पण आईपेक्षा चांगली आहे हे टिचरला आवडलं नसेल अशी तुझी तक्रार होती. मी तुझा निबंध वाचला. माझ्या डोळ्यातून खळ्ळकन पाणीच आलं. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तू म्हणालास, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी पुढच्या वेळेला अजून चांगला निबंध लिहीन. पण खरं सांगू, हरल्याचं दु:ख नव्हतंच मला. माझ्यासाठी तुझाच निबंध सर्वोत्तम होता. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' किंवा 'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसि' असली वाक्य छापून पहिलं बक्षिस मिळवणाऱ्याचा हेवा नव्हताच मला. मला कौतुक होतं ते तुझ्या निरागसतेचं. मनातली निरागसताच मनातलं प्रेम जपत असते याची जाणीव मला त्या दिवशी झाली होती.

तुला माहीतीये? मी क्रिकेटची मॅच का बघते? त्या कोहलीने मारलेल्या फोरचं किंवा धोनीने मारलेल्या सिक्सचं मला काहीच नसतं. पण त्याने फोर मारल्यावर तुझ्या तोंडावरचा ओसंडून वाहणारा आनंद मला महत्वाचा असतो. खरंतर माझं मॅचकडे लक्ष नसतंच मुळी. माझं लक्ष असतं तुझ्याकडे. तुझ्या आनंदाकडे. ज्या आनंदाची मी चाहती आहे, ज्या आनंदाची मी भुकेली आहे, त्या आनंदाकडे.

हे पत्र लिहीणं म्हणजे खरंतर आठवणींचा प्रवासच आहे. तुझ्या जन्मापासून ते अगदी कालपर्यंतच्या आठवणींचा झरा माझ्या मनात वाहतो आहे. तू जेंव्हा पहिल्यांदा 'आई' बोललास, जेंव्हा पहिल्यांदा चालायला लागलास, जेंव्हा पहिल्यांदा शाळेत गेलास, तुझे पहिले मित्र, तुझ्या सगळ्या आठवणी, अगदी सगळं सगळं कसं लख्ख आठवतंय. आठवतायत ते क्षण तुझ्या आनंदाचे, तुझ्या उत्साहाचे अन् आश्चर्याचे, नि तेही, तुझ्या पराभवाचे, अपमानाचे आणि रडवेल्या चेहऱ्यांचे. तू पहिल्यांदा सायकल चालवलीस त्या क्षणापासून ते काल रात्री विमानात बसून दूर देशी निघून जाण्याच्या क्षणापर्यंत. सगळं आठवतंय. अगदी स्पष्ट!

नाही. कालवाकालव नाही, उदासीनता नाही, हृदयात आहे, फक्त पोकळी. आजवर केवळ तुझ्या अस्तित्वाने व्यापलेल्या माझ्या आयुष्यात तुझ्याच जाण्याने बनलेली पोकळी. या पोकळीची, या एकटेपणाचीही सवय होईल काही दिवसांनी. पण ती पोकळी विरणार मात्र नाही. ती तशीच असेल. माझ्या मनात. कायमच.

हे पत्र लिहीण्यामागे emotional blackmail करण्याचा हेतू नाही. 'कायमचा जातो आहे. परत कधीच येणार नाही' या तुझ्या निर्धाराला सुरुंग लावण्याचाही हेतू नाही. विमानतळावर तू हट्टाने रोखलेल्या अश्रुंना पाझर फोडणे हाही हेतू नाही. मनातल्या तळमळीचं रुपांतर हळहळीत होण्यापूर्वीच तीला कागदावर उतरवण्यासाठी हे पत्र.

मला तुला परत बोलवायचं नाही, मला तुझ्या प्रगतीच्या आड यायचं नाही, मला माझ्या भावना तुझ्यावर लादायच्या नाहीत, किंबहुना मला तुला कोणताच त्रास होऊ द्यायचा नाही. फक्त आपल्या निर्णयामुळे आपल्या माणसांची आयुष्यं बदलू शकतात, याची जाणीव तुला करुन द्यायची आहे.

मला माहीत नाही की मी हे पत्र खरंच तुला पाठवेन की नाही. पण जर पाठवलंच तर या डबडबलेल्या डोळ्यांची साक्ष देऊन सांगते की माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, जेवढं काल होतं, आणि उद्याही राहील.

तुझ्याच आठवणींत रममाण,

तुझीच आई




Image source - Google



पूर्वप्रसिद्धी: Sourabh, annual magazine of MIT
अन्यत्र प्रसिद्धी: मासिक अंतराळ नोव्हेंबर २०१७

Contact Form

Name

Email *

Message *