Saturday, June 03, 2017

तळं

तळ्याच्या काठी,
दगड टाकत आणि काठ्या बुडवत
करायचा असतो विचार.
मांडायचा असतो लेखाजोखा आणि
जुळवायचा असतो हिशोब
झाल्या-गेल्याचा,
जमल्या-फसल्याचा आणि
विसरू पाहणाऱ्या आठवणींचा.

एखादं गाणं,
आपलंच आपल्याशी
गुणगुणत राहायचं असतं.
एखादी कविता,
फक्त आपल्यालाच आवडलेली 
ऐकवत राहायची असते.
आपलीच, आपल्याच मनाला.
रंगवायची असते एखादी मैफल 
निवडक गाण्यांची वा
मोजक्याच कवितांची.
आठवणीतल्या थोरांना स्मरत,
आपणही व्हायचं असतं
मोठं वगैरे,
जिंकायला ती मैफल,
जी आपणच रंगवली होती,
आपल्याच साठी.

तळं, दगडं वगैरे निमित्त फक्त.
मूळ मुद्दा संवादाचा.
हरवलेल्या गप्पा परत सांधण्याचा.
विसरलेल्या सुरांत,
हरवलेल्या भावना मिसळायच्या असतात,
अर्धवट चित्रात रंग सुने भरायचे असतात.
भरता भरता रंग,
थोडे लावूनही घ्यायचे असतात,
कोण काय म्हणेल पाहून,
विचार सगळे विसरायचे असतात.

तळं एव्हाना भरलेलं असतं.
हातातले दगड संपलेले असतात.
दगडांची चूक नसतेच मुळी,
तळ्याची भूक भागलेली असते.




Contact Form

Name

Email *

Message *