Tuesday, December 19, 2017

HBD ब्लॉगोबा


गेले सलग ६ दिवस ब्लॉगवर पोस्ट टाकत होतो, आणि आजचा हा सातवा दिवस! इतक्या कन्सिस्टन्सीने ब्लॉग लिहीन असं जन्मात कधी वाटलं नव्हतं. (याआधीच्या असंख्य विशेषणांनी भरलेल्या ५ पोस्ट्सपेक्षा हे लिहिताना नक्कीच मोकळं मोकळं वाटतंय...) असो!

आज माझ्या ब्लॉगला २ वर्षं पूर्ण झाली. म्हणजे या ब्लॉगवरची पहिली पोस्ट मी १९ डिसेंबर २०१५ ला टाकली होती, तिला २ वर्षं झाली. २ वर्षांत एकूण २२ पोस्ट मी लिहिल्या. (ही २३वी!) ब्लॉग लिहायला सुरु करण्यापूर्वी इतपत जमेलसं खरंच वाटलं नव्हतं. जमलं तर जमलं, नाही तर नाही... अशा अटीट्युडने ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. पण एक गोष्ट नक्की ठरवली होती, ती म्हणजे एखादा लेख मनापासून आवडला तरच ब्लॉगवर टाकायचा. थोडंफार जमलेलं काहीतरी, किंवा बऱ्याच दिवसात काही लिहिलं नाही असल्या कारणांनी कधीच दर्जाहीन गोष्टी पोस्ट करायच्या नाहीत. लोकांना आवडो न आवडो, पोस्ट करण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे.

२ वर्षात ब्लॉगला साधारण ८२०० पेक्षा जास्त व्हूज मिळाले. त्यापैकी साधारण ६००० पेक्षा जास्त हे भारतातून आणि ९०० पेक्षा जास्त हे अमेरिकेतून मिळालेले आहेत. मला नकाशावर बोटही दाखवता येणार नाही अशा अनेक देशांमधल्या अनेक वाचकांनी हा ब्लॉग वाचला. अनेकदा अनोळखी लोकांच्या कमेंट्स किंवा इमेल आले. एखादवेळेस एखाद्याला एखादा ब्लॉग खूपच भावला तर त्याचं भरभरून कौतुक असेल, किंवा एखादा दुसरा ब्लॉग वाचण्यासाठी सुचवणं असेल... असा प्रतिसाद नेहमीच भारी वाटायचा. त्यात कौतुक झाले यापेक्षा, कुणीतरी निदान वाचतंय तरी असा 'हुश्श!' भाव अधिक असायचा.

मी ब्लॉग लिहायला सुरु केलं तेंव्हा मराठी ब्लॉग्सच्या डिरेक्टरीज असायच्या. त्यावर एकदा रजिस्टर केलं कि नवीन ब्लॉग टाकल्यावर तिकडे दिसायचा. मग तिकडे येणाऱ्या लोकांना टायटल बरं वाटलं तर ते आपला ब्लॉग वाचणार. मी जिथे रजिस्टर केलं ती ब्लॉग डिरेक्टरी आता बहुदा बंद पडलीये आणि बाकी डिरेक्टर्यांना मला रजिस्टर करून घेण्याची इच्छा दिसत नाहीए. त्यामुळे आता जे काही व्ह्यूज येतात ते मीच गावभर केलेल्या जाहिरातीमुळे.

अनेकांना माझा ब्लॉग आवडतो. अनेक जण वाट बघतात. भेटल्यावर आवर्जून आठवण काढतात. लिहायला प्रोत्साहित करतात. असं कुणाकडून काही ऐकलं कि बरं वाटतं. अनेकांना ब्लॉग आवडतही नाही. अशा लोकांचाही मला उपयोग होतो. त्यातले काही लोक खरंच चांगल्या सुधारणा सुचवतात. मी त्यांचा विचार करतो, त्या पटल्या तर अमलात आणतो. याचा मला माझा ब्लॉग सुधारण्यास फायदा होतो. पण काही लोक काही कारण नसताना (किंवा आवडला असूनही तसं म्हणायची लाज वाटत असल्याने, किंवा पचत नसल्याने) ब्लॉगला नावं ठेवतात. यावरून मला मी करतो ती गोष्ट नक्की कुणासाठी आहे हे जास्तीत जास्त क्लिअर होत जातं. चालायचंच!

२ वर्षं म्हणजे काही फार मोठा टप्पा नाही याची मला जाणीव आहे. पण आपण केलेल्या गोष्टींकडे मागे वळून बघायला कुठे काय ठराविक कालावधी असतो? तुमच्यासारख्या माझ्या लाडक्या वाचकांमुळेच मी इतकं लिहू शकलो. यापुढेही मला मोटिवेट करत रहा, चुकांची जाणीव करून देत राहा, सुधारणा सुचवत राहा, आवडलं तर तुमचं कौतुक माझ्यापर्यंत पोहोचवत जा. एवढं पुरेसं आहे मला. (आणि हो! अनेकांनी अनेकदा विचारलेला प्रश्न- मला ब्लॉगचे पैसे किती मिळतात? उत्तर आहे, शून्य! मराठी ब्लॉगवर जाहिराती वगैरे देत नसतं कुणी. भविष्यात मिळायला लागले तर नक्की सांगेन. (किंवा तुम्हाला माहित असेल कसे मिळवायचे तरी सांगा!))

खाली काही स्क्रीनशॉट लावले आहेत. जाता जाता वाचून जा!















अजून होते थोडे... पण हरवले!

Monday, December 18, 2017

सवाई २०१७ । दिवस पाच



सकाळी ११:४५ला सुरु होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ८ पासून येऊन थांबलेले रसिक, रमणबागेच्या बाहेरच्या रस्त्यावर किलोमीटरभर लांब रांग, सुरक्षाव्यवस्थेसाठी नेहमीपेक्षा दुप्पट तयारी, आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरचं पार्किंग फुल्ल आणि मंडपाच्या आत जाण्यासाठी रसिकांची उडालेली झुंबड!!


हे आहे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचं वर्णन. स्वर्गीय सूर अनुभवण्याची शेवटची संधी, रविवार आणि मोठ्या मोठ्या प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण असा तिहेरी योग असताना अलोट गर्दी होणं साहजिकच होतं. अशा गर्दीतून वाट काढत सर्व रसिकांनी आपापल्या आवडीच्या जागा पटकावल्या आणि पहिल्या गायकाची म्हणजेच महेश काळेची आतुरतेने वाट पाहू लागले.

महेश काळे येताच त्याचं अगदी जल्लोषात स्वागत झालं. त्याची लोकप्रियता पाहता ते अगदी अपेक्षित असंच होतं. "माझ्या वयापेक्षाही जास्त काळ संगीत ऐकणारे श्रोते इथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत." असे सवाईच्या श्रोत्यांबद्दल गौरवोद्गार काढून त्याने गायनास सुरुवात केली. आजच्या सादरीकरणासाठी त्याने राग शुद्ध सारंगची निवड केली होती. सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात त्याने आपल्या ढंगदार गायनाने वातावरणाचा ताबा घेतला. त्याचे गुरु पं. जितेंद्र अभिषेकी यांना उद्देशून त्याने रचलेल्या बंदिशींचे त्याने सादरीकरण केले. बुवांना उद्देशून त्यात 'श्यामरंग' असा असा शब्द वापरला होता. आपल्या सादरीकरणात त्याने वैविध्यपूर्ण गायकीचे प्रदर्शन घडवले. राग सादर करून झाल्यावर रसिकाग्रहास्तव त्याला वेळ वाढवून देण्यात आली. वाढीव वेळात त्याने अवघे गर्जे पंढरपूर हा अभंग व कट्यार काळजात घुसली चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारे गीत 'अरुणी किरणी' गाऊन पुन्हा एकदा रसिकांची मने जिंकून घेतली.

महेशला तबल्यावर निखिल फाटक, पखवाजला प्रसाद जोशी, व्हायोलिनवर जेष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, हार्मोनियमवर राजीव तांबे, तंबोऱ्याला प्रह्लाद जाधव व पूजा कुलकर्णी यांची तर टाळाला अर्थातच माउली टाकळकर यांची साथ लाभली.

Image may contain: 3 people, people smiling
महेश काळे -  'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

महेश काळे याच्या अंगावर शहारे आणणाऱ्या सादरीकरणानंतर स्वरमंचावर पद्मा शंकर यांचे आगमन झाले. कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिन सादर केलेल्या पद्मा यांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मृदंगम आणि तबल्याच्या साथीने त्यांनी राग हंसध्वनी रंगवला. साथीदारांना पुरेपूर वाव देत केलेले सादरीकरण हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. कर्नाटकी संगीताच्या वेगळेपणाचा त्यांच्या सादरीकरणात पुरेपूर प्रत्यय आला. हंसध्वनीनंतर त्यांनी संत त्यागराजा यांनी एक रचना वाजवली. पं. भीमसेन जोशी यांना अभिवादन म्हणून त्यांनी 'माझे माहेर पंढरी' हा अभंग देखील सादर केला. यानंतर रसिकांनी वन्स मोअर दिल्याकारणाने त्यांनी भीमसेनजींचाच 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हा अभंग व्हायोलिनवर सादर करून मंचाचा निरोप घेतला.

पुढील सादरीकरण सुधाकर चव्हाण यांच्या गायनाचे होते. त्यांना तबल्यावर नंदकिशोर ढोरे, हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, पखवाजवर गंभीरमहाराज आणि टाळला सर्वेश बादरयाणी यांची साथ लाभली. रागसादरीकरणांनंतर त्यांनी 'ज्ञानियांचा राजा' हा अभंग गाऊन दाखवला. यावेळी जणू त्यांच्या दमदार आवाजाला भक्तीरसातील गोडव्याचं कोंदण लाभल्याचा भास झाला.

त्यापुढील सत्रात राजन कुलकर्णी व त्यांचे पुत्र सारंग कुलकर्णी यांनी सरोदवादन केले. या सादरीकरणासाठी त्यांनी राग वाचस्पतीची निवड केली. तबल्यावर निशिकांत बडोदेकर तर पखवाजवर ओंकार दळवी यांनी त्यांना साथ-संगत केली. रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

पुढील सादरीकरण हे रसिकांना आस लागून राहिलेल्या आनंद भाटे यांचं होतं. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या भाटे यांनी राग यमन कल्याण गात मैफलीस सुरुवात केली. अत्यंत सुमधुर अशा आवाजात उत्तरोत्तर रंगत गेलेलं सादरीकरण हा दिवसाचा परमोच्च बिंदू होता. शेवटी 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हा कन्नड अभंग सादर करून भाटे यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. सकाळी व्हायोलिनवर ऐकलेलं गीत संध्याकाळी साक्षात आनंदगंधर्वांच्या तोंडून ऐकणं हि रसिकांसाठी सुखाची पर्वणी होती. भाटे यांना तबल्यावर भरत कामत तर हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर यांची साथ लाभली. तंबोरा सांभाळायला विनय चितराव व मुकुंद बादरायणी सज्ज होते. अभंगाच्या वेळी टाळाची साथ करायला माउली टाकळकर यांनी हजेरी लावली. माउलींचा उत्साह बघून आनंदगंधर्वांच्या तोंडून हे ९१ वर्षाचे नसून १९ वर्षांचेच आहेत असे उद्गार निघाले!

भाटेंच्या दैवी सादरीकरणाला वन्स मोअर देण्याचा रसिकोत्साह पाहून श्रीनिवास जोशी यांनी 'आनंद आपलाच आहे, परत कधीतरी नक्की गाईल' असं सांगत, वेळ पाळली नाही तर आम्हाला बुजुर्गांचे फटके खावे लागतात या सत्याची जाणीव करून दिली.

Image may contain: 3 people, people on stage
आनंद भाटे - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

पुढच्या सत्रात उस्ताद शुजात खां यांनी सतारवादन केले. दोन तबलजी घेऊन वादन करण्याचा अनोखा प्रयोग त्यांनी केला. राग झिंझोटीचे बहारदार सादरीकरण हा रसिकाकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शेवटी सतारवादनासोबतच गात गात त्यांनी एक गझल सादर केली. त्यांच्या लौकिकास साजेसे असेच त्यांचे सादरीकरण ठरले.

ठेवा!

शेवटचे सादरीकरण किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका श्रीमती प्रभा अत्रे यांच्या गायनाचे होते. मी त्या सादरीकरणासाठी थांबू शकलो नसल्याने त्याविषयी लिहू शकत नाही. परंतु प्रभाताईंनी राग जोगकंसची मांडणी केली असे कळते.

रसिकांना श्रवणसुखाचा परमोच्च आनंद देऊन ६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली. देशोदेशीच्या शास्त्रीय संगीताच्या उपासकांसाठी शिरस्थ असलेल्या या संगीतसोहळ्याचा आज समारोप झाला. आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं किती महत्व असू शकतं याची जाणीव करून देणाऱ्या या पाच दिवसांची आज सांगता झाली. अनेक संगीतोपासकांना, अभ्यासकांना, रसिकांना आणि अभिजात शास्त्रीय संगीताच्या दैदिप्यमान परंपरेला या महोत्सवाने काय आणि किती दिलं आहे हे शब्दांत मांडता येत नाही.

काही गोष्टींसमोर नतमस्तक व्हायचं असतं, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या याबद्दल देवाचे शतशः आभार मानत. सवाईविषयी याहून वेगळी कुठलीच भावना नाही!

रजत जोशी

Sunday, December 17, 2017

सवाई २०१७ । दिवस चार


अभय सोपोरी यांचे मंत्रमुग्ध करणारे संतूरवादन, आरती अंकलीकर यांची अनुभवी आणि उत्तरोत्तर खुलत गेलेली गायन-मैफल आणि प्राची शहा यांचं कथक नृत्य अशा अनेकविध रंगांनी सजलेला आजचा चौथा दिवस!


आजच्या दिवसाची सुरुवात बंगाली गायक पं. तुषार दत्त यांच्या गायनाने झाली. तुषार दत्त यांनी राग गौड सारंग गाऊन आपल्या मैफलीला सुरुवात केली. अत्यंत शांत व संयमी सुरांत त्यांनी गौड सारंगचं सोनं केलं. त्यांनंतर त्यांनी शिवरंजनी मधली एक रचना सादर केली. प्रभावी पद्धतीने तबला वाजवत प्रशांत पांडव यांनी तुषार दत्त यांना समर्पक साथ दिली. शेवटी एक भजन गाऊन त्यांनी समारोप केला. यावेळी हार्मोनियमच्या साथीला अविनाश दिघे आणि टाळ वाजवायला अर्थातच माऊली टाकळकर होते.


पुढील सादरीकरण हे पं. भजन सोपोरी यांचे पुत्र अभय सोपोरी यांच्या संतूरवादनाचे होते. वस्तुतः पं. भजन सोपोरी हे सुद्धा या मैफलीत सहभागी होणार होते, परंतु काही कारणाने होऊ शकले नाहीत. अभय सोपोरी यांनी आजच्या सादरीकरणासाठी राग भीमची निवड केली होती. सुरुवातीला आपला स्वरविचार सांगून व रागाची मांडणी कशी आहे, कल कसा आहे हे समजावून सांगत त्यांनी सुरुवात केली. त्यांना तबल्याला उस्ताद अक्रम खान यांची तर पखवाजवर ऋषी शंकर उपाध्याय यांची साथ लाभली. मधूनच बंदिश गात त्यांनी अनोख्या पद्धतीने रागाचे सादरीकरण केले. सादरीकरणाच्या मध्यावर तबला व पखवाजशी जुगलबंदी करत त्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. रसिकांना दैवी सुरांची अनुभूती देऊन त्यांनी मैफलीचा समारोप केला. वादन थांबताच रसिकांकडून वन्स मोअर येण्याआधीच आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी स्वरमंचावर येऊन अभय सोपोरी यांना अजून थोडा वेळ सादर करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत सोपोरी यांनी काश्मिरी संगीतातील काही ऐकवण्याची तयारी दर्शवली. एक सुफी तराणा वाजवून त्यांनी श्रोत्यांना जणू स्वरानंदाची पुनरानुभूतीच दिली. सर्वार्थाने परिपूर्ण अशा सादरीकरणानंतर रसिकांकडून झालेल्या अमाप कौतुकाचा अत्यंत नम्रतेने स्वीकार करून त्यांनी स्वरमंचाचा निरोप घेतला.


सोपोरी यांच्या उत्कृष्ट सादरीकरणानंतर तितक्याच ताकदीचे गायक पं. उपेंद्र भट स्वरमंचावर दाखल झाले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या उपेंद्र भट यांनी आजच्या मैफलीसाठी राग दुर्गाची निवड केली. वस्तुतः राग दुर्गा हा रात्रीच्या प्रहरी गायला जाणारा राग आहे, परंतु सवाईच्या श्रोत्यांना ऐकायला मिळावा म्हणून भट यांनी हा राग संध्याकाळीच गायचं ठरवलं. "आवडलं तर गुरूंचा आशीर्वाद आणि चुकलं तर माझीच तपस्या कमी पडली." अशा नम्र शब्दांत त्यांनी सादरीकरणाची सुरुवात केली. भट यांनी अत्यंत जोशपूर्ण पद्धतीने गायनास सुरुवात केली. पदोपदी त्यांच्यातल्या ऊर्जेचा प्रत्यय श्रोतृवर्गास येत होता. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रदर्शनच घडत होते. राग दुर्गा नंतर त्यांनी 'अवघा आनंदी आनंद' हा अभंग गाऊन मैफलीची सांगता केली. यावेळी तबल्याच्या साथीला विवेक भालेराव, हार्मोनियमवर उमेश पुरोहित व सारंगीच्या साथीला दिलशाद खां होते.

दिवसाच्या पुढच्या टप्प्यात आजचे प्रमुख आकर्षण असलेल्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या शिष्या आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन होते. आरतीताईंनी आपल्या सादरीकरणासाठी राग रागेश्रीची निवड केली. आपल्या गायनातून एकेक सूर उलगडून दाखवत त्यांनी मैफल रंगवत नेली. एखाद्या अभ्यासू कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचा अभ्यास कसा दिसतो याचे मूर्तिमंत उदाहरणच जणू आरतीताईंनी प्रदर्शित केले. रागाच्या सादरीकरणानंतर त्यांनी हिंदी भाषेतील एक टप्पा गाऊन दाखवला. शेवटी 'बोलावा विठ्ठल' हा अभंग गाऊन त्यांनी मैफल समाप्त केली.

पुढचे सादरीकरण प्राची शहा यांच्या कथक नृत्याचे होते. दिसायला खूप छान आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण याखेरीज या नृत्याविषयी मी फार काही लिहू शकत नाही. शेवटी पद्मा तळवलकर यांचे गायन होते. जरी या सादरीकरणाला मी थांबलो नव्हतो, तरी त्यांनी फार सुरेल पद्धतीने राग भूप गायला अशी वार्ता कानी आलेली आहे.

संगीत हा सवाईचा गाभा असला तरी इथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात. मंडपाची सजावट, खाण्याचे स्टॉल्स (सवाईला 'खाणं आणि गाणं' असं म्हणलं जातं. यावरूनच समजून घ्या!), विविध कॅलेंडर, डायऱ्या, सीडी, चित्रे यांची प्रकाशन, विविध प्रकारचे रसिक इत्यादी गोष्टी सवाईच्या एकंदर माहोलाचाच भाग बनत असतात. सध्या स्वरमंडपाच्या मागच्या बाजूला सतीश पाकणीकर यांनी काढलेल्या फोटोंचे 'ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्स' नावाचे अफलातून प्रदर्शन भरले आहे. खाण्याच्या स्टोल्स वर हुरडा, चायनीज, उकडीचे मोदक इत्यादी विविध पदार्थांना रसिकांची पसंती मिळत आहे. या सगळ्या गोष्टींचा उद्या शेवटचा दिवस आहे, तेंव्हा गाण्याबरोबर याचाही आनंद घ्यायला विसरू नका...

Image may contain: 1 person, smiling, playing a musical instrument and standing
अभय सोपोरी - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

Image may contain: 2 people, people on stage
आरती अंकलीकर - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून


- रजत जोशी

Saturday, December 16, 2017

सवाई २०१७ । दिवस तीन


आजच्या दिवसाची सुरुवात आरती अंकलीकर टिकेकर यांच्या शिष्या गायत्री जोशी ह्यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंती गायला. अत्यंत आखीव रेखीव अशा पद्धतीने त्यांनी मधुवंतीची मांडणी केली. मैफलीच्या मध्यावर त्यांनी सरगम व आलापांच्या मदतीने राग उलगडून दाखवला. अत्यंत निरामय व सुंदर गायनामुळे आजच्या दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न झाली. मधुवंती नंतर गायत्री यांनी 'म्हारे घर आओ जी' हे भजन आणि 'जननी ये जिवलगे' हा अभंग गाऊन आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य जोशी ह्यांनी केली.

दुसऱ्या सत्रात कुशल दास यांचं सतारवादन होतं. त्यांनी राग मारवाची मांडणी केली. अत्यंत मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या मैफलीत कुशल दास यांना तबल्यावर पं. रामदास पळसुले यांची समर्थ साथ लाभली. एकमेकांच्या साथीने हे सादरीकरण अजूनच खुलत गेलं. स्वरमंडपात बसलेल्या सर्वच श्रोत्यांना या सादरीकरणादरम्यान जणू दैवी अनुभूती आली. मैफलीच्या मध्ये येणाऱ्या व्यत्ययांवर मात करत कुशल दास यांनी सांगीतिक कौशल्याची परिसीमा गाठली. यानंतर त्यांना वन्स मोअर न मिळता तरच नवल! वन्स मोअर चा अत्यंत आदराने स्वीकार करून त्यांनी आपल्या कलेची अजून एक चुणूक दाखवली. वेळ पाळण्याबद्दल अगदी आग्रही असलेल्या निवेदक आनंद देशमुखांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा आधार घेत श्रोत्यांना पुन्हा वन्स मोअर न देण्याबद्दल विनवले.

कुशल दासांच्या त्या दैवी सतारवादनाचा असर सरतो न सरतो तेवढ्यात पतियाळा घराण्याचे गायक सम्राट पंडित यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी राग गोरख कल्याण गाऊन आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. सुरेल गळ्याच्या सम्राट पंडित यांच्या गाण्यात त्यांची सदैव असलेली हसरी मुद्रा अजूनच रंग भरत होती. पंडित यांनी तबल्याची साथ पं. रामदास पळसुले व सारंगीची साथ दिलशाद खां यांनी केली. त्यावेळी तानपुऱ्यावर डॉ. राजश्री महाजनी व प्रलय मंडल साथीला होते.

आजच्या दिवसातील शेवटचं सत्र आणि तिसऱ्या दिवसाचा परमोच्च आकर्षणबिंदू म्हणजे पं. उल्हास कशाळकर यांचे गायन. कशाळकरांना हार्मोनियमच्या साथीला तुळशीदास बोरकर यांचे शिष्य श्रीराम हसबनिस, तसेच तानपुऱ्याच्या साथीला समर्थ नगरकर व सौरभ नाईक होते. गायनाला सुरुवात होण्यापूर्वी कशाळकरांचे मध्यप्रदेश सरकार कडून 'तानसेन पुरस्कार' मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तबल्याच्या साथीला असलेल्या तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांनी पूर्वी कशाळकरांबद्दल लिहिलेला एक परिच्छेद वाचून दाखवण्यात आला. आपल्या होणाऱ्या कौतुकाचा नम्रपणे स्वीकार करून व गुरुजनांप्रती आदर व्यक्त करून कशाळकर यांनी राग नंदने गायनास सुरुवात केली. अत्यंत शिस्तबद्ध, संयत व घरंदाज गायकीचे प्रदर्शन घडवत त्यांनी नंद रागाचे सौंदर्य उलगडून दाखवले. त्यांनंतर त्यांनी राग अडाणाचे सादरीकरण केले. शेवटच्या काही मिनिटांमध्ये भैरवी गात त्यांनी दिवसाचा समारोप केला.



भैरवी हा शेवट असतो. गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला आतून रितं करणारा शेवट. मनातल्या वादळांना शांत करणारा शेवट. आपल्याला अंतर्मुख करणारा शेवट. सगळं संपल्यानंतरही मनात रेंगाळत राहिलेली ती भैरवी आणि हळूहळू रिकामा होत जाणारा तो स्वरमंडप, या दोहोंना घेऊन मी उभा होतो. कसल्यातरी अंतिमाच्या न संपणाऱ्या शोधात...

Image may contain: 1 person, on stage and playing a musical instrument
पं. उल्हास कशाळकर - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

Image may contain: 1 person, sitting and night
कुशल दास - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

- रजत जोशी 
(सवाईच्या एका फॅन-पेज साठी लिहिलेलं वृत्त.)



Friday, December 15, 2017

सवाई २०१७ । दिवस दोन


एखाद्या दिवसाची आपण बऱ्याच काळापासून अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो दिवस आल्यावर आपली अवस्था अगदी 'अजि सोनियाचा दिनु' अशी होते. सवाईचा दुसरा दिवस अनेक रसिक श्रोत्यांसाठी असाच काहीसा होता. तब्बल ४ वर्षांनंतर 'सवाई'त परतून आलेल्या कौशिकी चक्रबोर्ती आणि तब्बल १२ वर्षांनंतर आपले सादरीकरण करणाऱ्या कला रामनाथ ह्या आजच्या दिवसाच्या प्रमुख आकर्षण होत्या.

आजचा दिवस पहिल्या दिवशीसारखा ३ वाजता न सुरु होता, ४ वाजता सुरु झाला. पं. कुमार गंधर्व ह्यांचे नातू आणि मुकुल शिवपुत्र ह्यांचे पुत्र असलेले भुवनेश कोमकली ह्यांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. आपल्या दमदार आवाजात राग मुलतानीमधील बंदिश गात त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. त्यानंतर त्यांनी माळवा आळवून आपल्या मैफलीची सांगता केली.

पुढचे सादरीकरण हे कला रामनाथ ह्यांच्या व्हायोलिनवादनाचे होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपले अढळ स्थान प्राप्त केलेल्या व्हायोलिनच्या उपासकांमध्ये 'कला रामनाथ' हे नाव अग्रस्थानी घ्यावे असेच आहे. आजच्या मैफलीसाठी कला ह्यांना तबल्यावर पं. योगेश समसी ह्यांची साथ लाभली. आपल्या सादरीकरणाची सुरुवात त्यांनी राग शामकल्याणने केली. व्हायोलिनवरचे प्रभुत्व क्षणोक्षणी सिद्ध करत त्यांनी वातावरण भारून टाकले. शेवटी एक कजरी सादर करून त्यांनी आपली मैफल संपवली. कला रामनाथ ह्यांच्या वादनासाठी त्यांचे गुरुबंधू शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर उपस्थित होते.

यापुढचे बहुप्रतीक्षित सत्र हे कौशिकी चक्रबोर्ती ह्यांचे होते. त्यांच्या सादरीकरणाला सुरुवात होताच रमणबागेच्या मैदानाबाहेर फटाके वाजू लागले. ते ऐकून कौशिकी ह्यांनी 'बाहेरील लोकांनाही आनंद झाला आहे' अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मारुबिहागने केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ह्या मैफलीत चक्रबोर्ती ह्यांनी आपल्या गायनातून मारुबिहागमधील बंदिशीसोबतच सरगमदेखील गाऊन रसिकांना तृप्त केले. गाण्याबरोबरच त्यांचे चेहऱ्यावरचे प्रफुल्लित करणारे भाव ह्या मैफलीचे आकर्षण ठरले. मारुबिहागनंतर त्यांनी राग बागेश्री गायला. शेवटी श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन कौशिकी ह्यांनी 'याद पिया कि आये' ह्या ठुमरीने आपली मैफल समाप्त केली. ह्या सादरीकरणासाठी पुण्यातील प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित होते.

कौशिकी ह्यांच्या सत्रानंतर संगीतमार्तंड पं. जसराज ह्यांचे गायन झाले. वयाच्या ८७व्या वर्षीदेखील त्यांनी अफाट ऊर्जेने केलेले सादरीकरण रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरले. त्यांनी आपल्या मैफलीत राग शंकराचे सादरीकरण केले. एक भजन गाऊन त्यांनी आपल्या गायनाचा व दुसऱ्या दिवसाचा समारोप केला.

Image may contain: 1 person, playing a musical instrument and child
श्रीमती कला रामनाथ - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

Image may contain: 1 person, smiling
कौशिकी चक्रबोर्ती - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

संगीत हे मनुष्याचे आनंदनिधान असते. 'सवाई'च्या मैफलीत मोठमोठ्या गायक, वादक, जाणकार किंवा अभ्यासकांबरोबरच सामान्य, शास्त्रीय संगीत न कळणाऱ्या परंतु ते मनापासून आवडणाऱ्या श्रोत्यांची उपस्थिती असते. त्यांच्यासाठी तो एक आनंदाचा वाहता झराच असतो. हे ५ दिवस त्यांना पुढच्या संपूर्ण वर्षासाठी ऊर्जा देत असतात. 'सवाई'च्या मंचाची, जागेची, वातावरणाची किंवा एकंदर माहोलाचीच ही अनुभूती असते.

- रजत जोशी 
(सवाईच्या एका फॅन-पेज साठी लिहिलेलं वृत्त.)


१. पहिल्या दिवसाचे वृत्त
३. तिसऱ्या दिवसाचे वृत्त
४. चौथ्या दिवसाचे वृत्त
५. पाचव्या दिवसाचे वृत्त

Thursday, December 14, 2017

सवाई २०१७ | दिवस एक


डिसेंबरचा 'तो' दिवस... रमणबागेच्या भल्यामोठ्या मैदानावर उभारलेला तो राजेशाही मंडप... दुपार होताच तिकडे वळू लागलेली असंख्य पावलं... हळूहळू गर्दीने फुलून जाणारा तो परिसर... आणि ३च्या ठोक्याला सर्वांच्या कानी पडलेला तो चिरपरिचित आवाज, 'रसिकहो नमस्कार!'

पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेतलं मानाचं पान म्हणजे 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'! ६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात ही अशीच काहीशी झाली. खरंतर 'सवाई'ची सुरुवात डिसेंबरच्या दुसऱ्या बुधवारी होतच नसते. ती होत असते नोव्हेंबरच्या मध्यावर, जेंव्हा सर्व दर्दी रसिकांचं लक्ष लागून असलेली कलाकारांची यादी प्रसिद्ध होते. त्या क्षणापासून ते सवाईमंडपात स्थानापन्न होण्याच्या क्षणापर्यंत सर्वांच्या मनात ह्यावर्षीच्या 'सवाई' बद्दलची उत्सुकता घर करून असते.

२०१७च्या महोत्सवाची सुरुवात मधुकर धुमाळ ह्यांच्या सनईवादनाने झाली. धुमाळ ह्यांनी भीमपलास रागाने त्यांची मैफल सजवली. मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या सादरीकरणानंतर संगीत वाद्यांचे विक्रेते मिरजकर ह्यांच्याकडून आर्य संगीत प्रसारक मंडळाला ४ तानपुरा जोड भेट म्हणून मिळाले. त्यावर सवाई गंधर्व व पं. भीमसेन जोशी ह्यांची चित्रे सोन्याने एम्बॉस केलेली होती. अशाप्रकारचं रसिकांचं, जाणकारांचं किंवा कलाकारांचं मिळणारं प्रेम हे 'सवाई'चं वैशिष्ट्यच आहे.

यापुढील सादरीकरण हे डॉ. विजय रजपूत ह्याचं होतं. डॉ. रजपूत हे भीमसेन जोशींचे शिष्य आहेत. गायनाची सुरुवात करण्यापूर्वीच "जितना संगीत सिखा है वो आज के इस कार्यक्रम के लिये ही सिखा है।" अशा शब्दात नम्रतेचे प्रदर्शन घडवत त्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. आपल्या मैफलीत पुरिया कल्याण आळवत त्यांनी त्यांच्यातल्या तयारीच्या गवयाचे दर्शन घडवले.

डॉ. रजपूत यांच्या गायनानंतर देबाशिष भट्टाचार्य ह्याचं चतुरंगी म्हणजेच, स्लाईड गिटार वादन होतं. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ह्या सादरीकरणाचं वर्णन 'आजच्या दिवसातील सर्वोत्तम' असेच करता येईल. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या ह्या सादरीकरणाने सर्वांचीच वाहवा मिळवली.

पुढील भागात बनारस घराण्याचे जेष्ठ गायक-बंधू राजन व साजन मिश्रा ह्यांचे गायन झाले. मिश्रा बंधूंनी पुरिया राग आळवला. इतक्या वर्षांच्या तपस्येने आलेला अनुभव व संगीताप्रती असलेली निष्ठा त्यांच्या सादरीकरणातून पदोपदी जाणवत होती. देशमुखांच्याच भाषेत सांगायचं झालं तर स्वरयंत्र २ असली तरी स्वर मात्र एकच निघत होता.

यापुढचे आणि दिवसातील शेवटचे सादरीकरण म्हणजे पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया ह्यांचे बासरीवादन. ह्या सादरीकरणापूर्वी हरिजींच्या हस्ते शिवकुमार शर्मा व खुद्द हरिजी ह्या शिव-हरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संगीतातील ख्यातनाम जोडीची छायाचित्र असलेली एक दिनदर्शिका प्रकाशित झाली. आपल्या मिश्किल शैलीत हरिजींनी त्या दिनदर्शिकेवर काही टिप्पणीदेखील केली. हरिजींना साथसंगत करण्यासाठी मोठे कलाकार उपस्थित होते. तबल्यावर विजय घाटे, पखवाजवर भवानी शंकर आणि बासरीची साथ करायला त्यांच्याच शिष्या देबोप्रिया व शिष्य वर्तक उपस्थित होत्या. बासरीवादनाची सुरुवात राग बिहागने करण्यात आली. अत्यंत सुमधुर असा राग बिहाग, हरिजी व विजय घाटे ह्यांच्या खिळवून ठेवणाऱ्या जुगलबंदीबरोबरच संपला. त्यानंतर श्रोत्यांच्या इच्छेला मान देऊन हरिजींनी पहाडी धून आळवली. रात्रभर वाजवत राहण्याची तीव्र इच्छा असूनही तसे करता येत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. सादरीकरणाचा समारोप आरतीने झाला.

१० ची वेळ पाळत 'सवाई'चा पहिला दिवस संपन्न झाला. दिवसभर ऐकलेले सूर डोक्यात घोळवत, संगीताच्या अथांग सागराला शरण जात श्रोते आपापल्या घरी रवाना झाले, ते उद्याच्या दिवसाची उत्सुकता मनात ठेऊनच!

Image may contain: 2 people, people playing musical instruments, people on stage and guitar
देबाशिष भट्टाचार्य - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून


Image may contain: 4 people, people on stage
पं. हरिप्रसाद चौरसिया - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून


- रजत जोशी
(सवाईच्या एका फॅन-पेज साठी लिहिलेलं वृत्त.)

Wednesday, December 13, 2017

संवाद

बोलणे वाऱ्यावरी अन् चंद्रदरवळ चांदणे
रात्र आहे. यत्न आहे, शांततेशी बोलणे

स्व:समर्पित ह्या क्षणांचे अंतरीशी बोलणे
वाहणे, भांबावणे अन् रक्तदुर्लभ थांबणे

वाट आहे एकली अन् गूढ-प्राचीन लक्षणे
त्या स्वयंभू भावनांचे भावनांशी खेळणे

सांडली स्वप्ने जरी, ना थांबले हे स्वप्नणे
व्यर्थ आहे, मान्य आहे, पण तरीही चालणे


पूर्वप्रसिद्धी: Sourabh 2017, annual magazine of MIT

Monday, November 20, 2017

Untitled Post - 2

मी का दुःखात आहे? कि मी आनंदात उगाचच दुःख शोधण्याचा प्रयत्न करतोय? तसं असेल तर ते अजून वाईट आहे, कारण जीवनाचा उद्देशच जर आनंदाचा शोध असेल तर आनंदात असताना दुःख शोधणे हा करंटेपणा नाही का? की गोड जेवणात असलेलं तिखट लोणचं? वरवर पाहता मला माझ्या दुःखाचं काही कारण दिसत नाही. कदाचित मी लौकिकार्थाने दुःखी नसेनही. पण मनातून काहीतरी चुकल्यासारखं, हरवल्यासारखं वाटतं त्याचं काय?

माझ्या जीवनाकडून फार अपेक्षा आहेत का? कदाचित हो! मला जास्तीत जास्त भाषा शिकाव्याश्या वाटतात, जास्तीत जास्त राग ओळखू यावेसे वाटतात, जास्तीत जास्त programming languages शिकाव्याशा वाटतात, जास्तीत जास्त पुस्तकं किंवा ब्लॉग वाचावेसे वाटतात, जास्तीत जास्त लिहावंसं वाटतं, जास्तीत जास्त क्रिकेट बघावंसं वाटतं, जास्तीत जास्त गाणी ऐकावीशी वाटतात, जास्तीत जास्त चांगली बासरी वाजवावीशी वाटते. हे सगळं करताना आयुष्य पुढे जातच राहतं. रोज नव्या घटना घडतच राहतात. रोज अभ्यास करावाच लागतो. रोजच्या पेपरमध्ये काहीतरी नवीन असतंच. रोज कुणीतरी काहीतरी नवीन करायला सांगतं. रोज काही नवीन घडतंच असतं. त्यातल्या कित्येक गोष्टी माझ्या आयुष्याशी इतक्या बांधलेल्या असतात कि त्यातून माझी सहजासहजी सुटका होणं शक्य नसतं.

पण तरी माझ्या माझ्याकडूनच एवढ्या अपेक्षा का आहेत? का मला ह्यातली एखादीही गोष्ट सोडून द्यावीशी वाटत नाही? का मला प्रत्येक गोष्टीतला सर्वोत्तम माणूस खुणावत असतो? का मला असं वाटतं कि मी त्या उंचीला प्रत्येकच क्षेत्रात पोहोचू शकेन, जेंव्हा मला आत खोलवर कुठेतरी जाणीव असते कि मी सर्वोत्तमाच्या तुलनेत कुणीच नाही? का मी वारंवार स्वतःचे अपेक्षाभंग करून घेतो आहे? तेही हे असं करत असल्याची जाणीव असताना?

का मला ह्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं माहित नाहीत? कि माहित असून मला ते कळत नाहीए?

काहीच कळत नाही!

Friday, October 20, 2017

पुस्तकखरेदी


आज खूप दिवसांनी नवीन पुस्तकं घेतली. खरंतर खूप वर्षांनी! गेल्या २-३ वर्षांत दुकानात जाऊन पुस्तकं घेतलीच नव्हती. जी ४-५ घेतली होती ती सगळी ऑनलाईनच घेतली होती. त्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून अशा प्रकारच्या खरेदीपासून वंचित होतो.

ऑनलाईन खरेदी सोयीची, स्वस्त वगैरे असते हे अगदी खरंय, पण पुस्तकाच्या दुकानात जाऊन पुस्तकं घेण्यातली मजा त्यात नसते हे दसपटीने खरं आहे. पुस्तकाच्या दुकानाचा माहोलच काही वेगळा असतो. लेखकांच्या नावानुसार किंवा पुस्तकाच्या जॉनरनुसार शेकडो पुस्तकं मांडून ठेवलेली असतात. आपल्याआधी आलेली गिऱ्हाईकमंडळी कुठल्याशा कप्प्यासमोर उभं राहून पुस्तकं न्याहाळत असतात, किंवा कुठल्याशा पुस्तकाचं मलपृष्ठ, प्रस्तावना किंवा आतलं एखादं पान लक्षपूर्वक वाचत असतात. काही हौशी लोक दुकानाच्या मालकालाच दुकानभर फिरवून त्याच्याशी गप्पा मारत असतात. काही लोक तिथलंच एखादं स्टूल पकडून निवांत वाचत बसलेली असतात.

पुस्तकाच्या दुकानात स्थळा-काळाचं भान ठेऊन जायचंच नसतं. समोर दिसेल त्या पुस्तकात बुडून जायची तयारी ठेऊनच यायचं असतं. फिरता फिरता आपल्याला कित्त्येक दिवसांपासून घ्यायची असलेली, कुणीतरी कधीतरी 'नक्की वाच' म्हणून सांगून ठेवलेली, आपणच कधीतरी कुणीतरी सांगितलेलं कवित्व ऐकून 'नक्की वाचायचं' ठरवूनही विसरलेली अशी अनेक पुस्तकं तिथे दिसत असतात. मग आपण हळूहळू एकेक पुस्तक पारखत निरखत निवडायचं असतं. थोडं वाचायचं असतं, मात्र उरलेलं नंतर वाचण्यासाठी विकत घ्यायचं असतं.

मी बऱ्याच दिवसांपासून कोथरूडमध्ये सुरु झालेल्या एका नव्या दुकानाबद्दल ऐकून होतो आणि तिथे जाण्याची इच्छा मनी बाळगून होतो. आयडियल कॉलनीतल्या एका छोट्याशा, शांत लेनमध्ये 'पुस्तक पेठ' हे दुकान आहे. आज सकाळी मी तिकडे गेलो. तिथे गेल्यावर अगदी वरच्यासारखा अनुभव येतो. दुकानाच्या मालकांनी अगदी हसतमुख चेहऱ्याने माझं स्वागत केलं. २-३ वर्षांचं हरवलेलं काहीतरी पुन्हा सापडल्यासारखं वाटलं. मी एकेक पुस्तक बघायला सुरुवात केली. दुकानाचे मालकही मधेच येऊन एखादं पुस्तक सुचवत होते. माझी नजर वेधून घेणारी अनेक पुस्तकं तिथे होती. त्या छोट्याशा दुकानातून मनसोक्त फिरत ३ पुस्तकं मी निवडली. त्या पुस्तकांवर अनपेक्षित discount मिळवून, तरीही बजेट ओव्हरफ्लो झाल्याचं गोड guilt मनात घेऊन आणि पुस्तक पेठेचं स्टार सभासदत्व घेऊनच मी बाहेर आलो.

दिवाळीचं शॉपिंग याहून चांगलं काय असतं?

पुस्तकं वाचून झाल्यावर लिहावंसं वाटलं तर ह्या पुस्तकांबद्दल नक्की लिहीन, पण सध्या थोडासा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाहीए.

पहिलं पुस्तक पु. लं. देशपांडेंचं 'एक शून्य मी' हे आहे. पुलंची अनेक विनोदी पुस्तकं आपल्याला माहिती असतात, आपण त्यांची अक्षरशः पारायणं केलेली असतात. पण पुलंनी केलेलं वैचारिक लेखन आपण फारसं वाचलेलं नसतं. पुलंच्या ह्या पुस्तकात त्यांच्या लेखनाचा नेमका हाच पैलू अधोरेखित झालेला आहे. काही दिवसांपूर्वी हे पुस्तक मला कुणीतरी recommend केलं होतं आणि त्यामुळे माझ्या ते लक्षात होतं. 

दुसरं पुस्तक हे Haruki Murakami ह्या जपानी लेखकाने लिहिलेलं 'Kafka on the shore' हे आहे. ह्या 'fiction' वर्गात मोडणाऱ्या पुस्तकाची काही परीक्षणं मी वाचली होती आणि त्यामुळे हे पुस्तक वाचायची माझी तीव्र इच्छा होती.

मी घेतलेलं तिसरं पुस्तक म्हणजे व. पु. काळेंचं 'वपुर्झा'. मी इतकी वर्ष वपुंच्या अनेक पुस्तकांपैकी एकही पुस्तक वाचलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी त्यांचं 'पार्टनर' हे पुस्तक वाचल्यावर मला त्यांच्या लेखनातल्या जादूची अनुभूती झाली. 'पार्टनर' खूप आवडल्याने आणि 'वपुर्झा'बद्दल बरंच ऐकून असल्याने मी तेही पुस्तक लगेच घेऊन टाकलं.

वाचायची इच्छा असलेल्या पुस्तकांची मी एक यादी बनवलेली आहे. कुठल्या नव्या पुस्तकाबद्दल वाचलं किंवा कुणी एखादं पुस्तक वाचायला सुचवलं की मी त्या पुस्तकाचं नाव त्या यादीत टाकत असतो. आज दुकानात जाताना ती यादी एकदा वाचून ठेवली होती. शक्यतो फार शोधाशोध करावी लागू नये असा उद्देश होता. पण दुकानात गेल्यावर त्या यादीचा मला जणू विसरच पडला. तिथे असलेली असंख्य पुस्तकं मला भुरळ पाडत गेली आणि तीनपैकी फक्त एकच  पुस्तक मी त्या यादीतलं घेतलं.



बऱ्याच दिवसांनी (दुकानात जाऊन) घेतलेल्या पुस्तकांमुळे झालेला आनंद आणि नव्या पुस्तकांबद्दल असलेली उत्सुकता मला स्वस्थ बसून देत नाहीए. शेजारीच असलेली तीनही पुस्तकं मला हाका मारताहेत. याहून जास्त वेळ हा ब्लॉग लिहीत बसणं मला जमणार नाहीए. लेखन थांबवून वाचन कधी सुरु करतोय असं मला झालंय. सध्यापुरता बाय बाय!


Friday, September 29, 2017

Placement Diaries


अनेक वर्षांपासून अनेकांच्या तोंडून 'Placement' बद्दल वगैरे ऐकून होतो. काय तर म्हणे, कंपन्याच कॉलेजमध्ये येतात, काही मुलांचा interview घेतात आणि नोकरी देतात. लहानपणी हे सगळं एकदम गमतीशीर वाटायचं. आपण नोकरीसाठी न फिरता कंपन्या आपल्यासाठी येतात वगैरे ऐकून एकदम मस्त वाटायचं.

कालांतराने मी मोठा झालो. Engineering वगैरे शिकायला लागलो. शेवटच्या वर्षालाही पोहोचलो. आता माझ्याच कॉलेजमध्ये Campus Placements सुरु झाल्या. सगळा नवीनच अनुभव होता. मी ह्या सगळ्या process बद्दल काहीतरी लिहून ठेवायचं ठरवलं, आणि ह्या विचारातूनच 'Placement Diaries'चा जन्म झाला.

तारखेनुसार placement संबंधीच्या गोष्टी, माझे विचार, भावना इत्यादी गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत असलेले, अनुभवणार असलेले किंवा अनुभवलेले अशा लोकांना हे अगदी relate होईल. ज्यांनी माझा प्रवास जवळून बघितला आहे अशांनाही काही गोष्टी अगदी ओळखीच्या वाटतील. हे सगळं असलं तरी ह्यात थोडंफार repetitive आहे. लेखाच्या मध्यावर कंटाळा येऊ शकतो. (Originally हे मी ब्लॉगवर टाकण्यासाठी लिहिलंच नव्हतं. पण आता टाकतोय.) कंटाळा आल्यास चक्क 'Skip to End' करण्यास किंवा थोडं-थोडं चाळत पुढे जाण्यास काहीच हरकत नाही. शेवट मात्र नक्की वाचावा.

'Placement Diaries' आवडतील अशी आशा आहे.. 


३/७/२०१७

परवाच Morgan Stanley येणार असल्याचा मेल आला होता. मेल आला कसला? मीच मागून घेतला. Live backlog मुळे मला तो मेल आलाच नाही. शेवटी मित्राकडून मागितला. १६.१७ लाखाचं package होतं. इतकं जास्त package म्हणजे तितकीच जास्त अवघड test असणार हे उघडच आहे. पण तरीही मला ती test देण्याची जाम इच्छा होती. काहीही झालं तरी शेवटी पहिली कंपनी आहे!

असो! आज दुपारी २ वाजेपर्यंत apply करण्याची मुदत होती. त्याच्या आत result लागेल, माझं all clear होईल, मी लगेच placement portal वर result update करेन, लगेच Morgan Stanley च्या समोर 'Not applicable'चं 'Applicable' होईल, आणि मी लगेच apply सुद्धा करेन अशी वेडी, भाबडी, अवास्तव वगैरे आशा मला होती. सकाळपासून प्रॅक्टिकलमध्ये एका tab मध्ये युनिव्हर्सिटीची website चालू ठेवली होती. Result काही लागला नाही. Placement portal वरूनही Morgan Stanley अदृश्य झाली. आता पुढच्या स्टेशनाची वाट पाहायची... 


५/७/२०१७

अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु!

ZS Associates चं आगमन. ही कंपनी live backlog वाल्यांना सुद्धा घेते म्हणे. (म्हणजे recruitment notification मधेच तसं लिहिलं आहे. अगदी धडधडीत!) मेल वाचल्या वाचल्या क्षणार्धात apply चं बटन दाबून सद्गती प्राप्त करून घ्यावी असा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला. पण एकदा ही कंपनी कशी आहे हे चार लोकांस विचारावे व मग शांत मनाने निर्णय घ्यावा असं वाटलं. तर चार लोकांनी चारशे कथा सांगितल्याने मी भांबावून जाऊन निर्णय उद्यावर ढकलला आहे. शेवटी, ऐकावे जनाचे करावे मनाचे ह्या न्यायाने वागू!


६/७/२०१७

भयंकर पावसात भिजत कॉलेजात गेलो. आजच्या दिवसाचा एकच agenda होता. "To be or not to be!" कालच अनेक लोकांना ZS (उच्चार: झिएस) बद्दल विचारून थोडाफार विचार करून ठेवला होता. आज त्यांच्या जॉब डेजिग्नेशन्स बद्दल थोडी माहिती काढली. ४ वर्ष coding वगैरे शिकून नोकरीला लागल्यावर पुढची आणिक चारेक वर्ष तरी ह्या ज्ञानाचा वापर व्हावा अशी तरी नोकरी पकडू, इतकी भावना ह्यामागे होती. उगाच काहीतरी management किंवा marketing च्या जॉबला तर आपण apply करत नाही ना, ह्याची तेवढी खात्री करून घेतली. हे झाल्यावर ZSवाल्यांची वेबसाईट, फेसबुक पेज, ट्विटर हॅन्डल वगैरे वर नजर टाकली. Apply करावं असं ज्या क्षणी मनापासून वाटलं त्याच क्षणी apply करून टाकलं. आता aptitude ची वगैरे तयारी सुरु... 


१२/७/२०१७

मध्यंतरी Tata technologies आणि Deloitte अशा २ कंपन्या येऊन गेल्या. दोघांनाही applicable नसल्याने माझ्या प्लेसमेंट-लाईफ मध्ये काहीच फरक पडला नाही. Deloitteचं थोडं वाईट वाटलं, पण आता सवय होऊ लागली आहे. ZS बद्दल थोडीफार माहिती काढली आणि तयारी चालू केली. १८ तारखेला aptitude आणि २० तारखेला interview आहे.

आज एक नवीन कंपनी आली. MU Sigma! ३.३ लाखांचं पॅकेज. पण त्यांचं job location बेंगलोर असल्यामुळे मी eligible असूनही apply न करण्याचं ठरवलंय. (माज! दुसरं काय) १४ तारखेपर्यंत मुदत आहे. विचार बदलला तर करेनही... देवाघरचे ज्ञात कुणाला!!


१३/७/२०१७

आज Mu Sigmaला apply केलं. एकतर ५ राउंड्स असल्यामुळे शेवट गाठण्याची शक्यता कमीच आहे. त्यातूनही झालोच सिलेक्ट तर technical interview ला चुकीची उत्तरं देणं माझ्याच हातात आहे. जीवावर येईल, पण नवीन अनुभवही मिळेल. बघू!


१५/७/२०१७

Results are out! अखेर all-clear झालो! रात्री साडेबाराला result लागला. Backlog सुटला. Aggregate सुद्धा ६६% च्या वर राहिला, which means आता येणाऱ्या जवळजवळ सगळ्या कंपन्यांना मी apply करू शकतो. कसंय, battingच न मिळण्यापेक्षा batting करून आऊट झालेलं बरं. निदान batting केल्याचं तरी समाधान मिळतं. कुठल्या कंपनीत मी सिलेक्ट होईन माहित नाही, पण किमान आता कुठल्याही कंपनीला apply करण्यापासून मला कोणी रोखू शकणार नाही. ह्याचा दुसरा अर्थ असा कि, 'कधीनव्हेते eligible झालोय, करून टाका apply' असं पाण्यात पडल्यासारखं करायची गरज नाही.

असो! जे जे होईल ते ते पाहावे... 


१८/७/२०१७

आज ZS ची aptitude test होती. बऱ्यापैकी अवघड प्रश्न खूपच कमी वेळात (८५ मिनिटात ७५ प्रश्न) सोडवणं अपेक्षित होतं. बऱ्याचश्या प्रश्नांची उत्तरं काढायला जमली, पण वेळ कमी पडला. Sectional cut-off च्या नियमाचाही नीट विचार झाला नाही, आणि as a result मी पुढच्या राउंडला qualify होऊ शकलो नाही. ९७० मुलांपैकी फक्त ९१ मुलांना पुढच्या राउंडला (म्हणजे Video interviewला) जाता आलं. जमू शकलं असतं. जमवायला पाहिजे होतं. असो! आता ह्यापुढे Mu Sigma कंपनी आहे. ती फार सिरिअसली द्यायची नसल्याने नवीन कुठली कंपनी येते ह्याकडे लक्ष आहे.


२१/७/२०१७

आज एकदम २ कंपन्या आल्या. eQ technologic आणि CLSA. त्यातली eQ ही कंपनी चांगली वाटतीये. CLSA पण तशी बरीये, पण एकच problem आहे. CLSA ही एक चायनीज इन्व्हेस्टमेंट बँक आहे. चीनमधल्या उद्योग-धंद्यांना वित्तपुरवठा करणे, त्या उद्योगांसाठी data analysis करणे, Cross border capital flow facilitate करणे इत्यादी कामं तिथे केली जातात. 'bridge China to the world and the world to China' असा त्यांचा उद्योगाचा दृष्टिकोन आहे. अशा कंपनीत काम करणं मला फारसं योग्य वाटणार नाही. कितीही Global दृष्टिकोन ठेवायचा वगैरे ठरवलं तरी (शत्रू वगैरे सोडा-) competitor ला business वाढवायला मदत करणं काही मला शक्य नाही (आणि अतार्किक पण आहे.). CLSA ची job profileही फारशी उत्साहवर्धक नव्हती. Finance sector मधली कंपनी असल्याने छोटी-मोठी tools बनवणे, data handling करणे वगैरे गोष्टी कराव्या लागल्या असत्या.

पण eQ आणि CLSA ह्या दोन्ही कंपन्यांना मी apply करून टाकलं. CLSA  साठी 'Mu Sigma strategy' चा अवलंब करण्यात येईल, आणि eQ साठी कसून अभ्यास करण्यात येईल.

पुढच्या आठवड्यात २४ला Mu Sigma, २५ला CLSA आणि २७ला eQ आहे. A lot of things are going to happen. Let's see!


२५/७/२०१७

काल Mu Sigmaची aptitude होती. अपेक्षेपेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त वेळ मिळाल्याने ती test अपेक्षेपेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त चांगली गेली. Mu Sigma च्या परीक्षेनंतर Microsoft कंपनी येत असल्याचा mail आला. Aggregate ७०% लागत असल्याने मी eligible नव्हतो. तसंही असतो तरी काय दिवे लावले असते? २२.३८ लाखाचं package असलेल्या कंपनीची test किती अवघड असणार हे वेगळं सांगायला नकोच.

कालची Mu Sigma आणि आजची CLSA हे दोन सराव सामने असल्याने 'जे जे होईल ते ते पाहावे' या न्यायाने मी समोर येईल ते करत गेलो. आज CLSA चे ३ राउंड्स होते. Aptitude test, Coding test आणि behavioral test. ह्या सगळ्यातून पुढे गेल्यास उद्या २ interview आहेत. Test झाल्यावर लगेच अर्ध्या तासात mail पाठवून result कळवण्याची सोय त्यांनी केली होती. Aptitude झाल्यावर सगळे लॅबपाशीच रेंगाळत थांबले. अर्ध्या तासाचा पाऊण तास झाला. ज्यांना स्वतः लावलेल्या दिव्यांबद्दल खात्री होती ते एव्हाना वाटेला लागले. उरलेले timepass करत तिथेच थांबून राहिले. इतक्यात mail आला. मी पुढच्या राउंड साठी select झालो होतो. Placement seasonचं पहिलं यश!

पुढचा राउंड coding चा होता. ९० मिनिटांत ३ प्रोग्रॅम्स. १ प्रोग्रॅम SQL चा होता. उरलेले २ C, C++, Java किंवा C# पैकी एखाद्या language मध्ये करायचे होते. SQLचा प्रोग्रॅम लगेच झाला. उरलेल्या २ पैकी १ फारच अवघड होता, त्यामुळे त्यावर १०-१५ मिनिटे कष्ट करून मी तो सोडून दिला. तिसरा मला जवळपास जमला, पण काहीतरी बारीकशा त्रुटीमुळे तो हवा तसा झाला नाही. ह्या राऊंडनंतर परत अर्ध्या तासाने mails आले. ह्यावेळी मात्र माझं नाव नव्हतं. CLSA तसंही नकोच असल्याने फार वाईट वाटलं नाही. उलट १ राउंड पुढे जाता आलं याचाच काय तो आनंद!


२६/७/२०१७

आज Vodafone कंपनी आली. Recruitment process बद्दल सिनियरकडून थोडी माहिती घेऊन apply करून टाकलं. Recruitment date सांगितलीच नाहीए. असो!

आज दुपारी CLSA कंपनीचे reviews वाचत होतो. ९०% पेक्षा जास्त ex-employees चं कंपनीबद्दलचं मत अत्यंत वाईट आहे. कंपनीची management कशी त्रासदायक आहे, कशी पिळवणूक केली जाते, कसा मानसिक त्रास होतो इत्यादी गोष्टी अनेक जणांनी लिहिल्या आहेत. हे वाचल्यामुळे 'जे होतं ते चांगल्यासाठीच' ह्याचा पुनःप्रत्यय आला. 

संध्याकाळी Mu Sigmaचा mail आला. मी पुढच्या राउंडला select झालो आहे. पुढचा राउंड कसा, कधी असणार ह्याबद्दल काहीच माहिती नाही. नको असलेल्या कंपन्यांमध्ये select होण्याचं दुःख नाही, पण हव्या असलेल्या कंपन्यांमध्ये reject व्हायला नको म्हणजे झालं. Mu Sigmaच्या resultने एक गोष्ट झाली. उद्याच्या eQसाठी confidence मिळाला. एकूण aptitudeचा स्कोरही २-१ असा झाला. ZSची aptitude exam clear न करू शकल्याचं दुःख थोडं कमी झालं. उद्या eQ... 


२८/७/२०१७

काल eQ ची test झाली. अत्यंत सोपे प्रश्न, अत्यंत मूर्खपणा करून मी चुकवले. याहून सोपी test कुठल्याही कंपनीची असेल असं मला वाटत नाही, आणि याहून जास्त चुका स्वतःच्या हाताने मी करू शकेन असंही वाटत नाही. ZSला २, Deloitteला २ आणि eQला एक अशी ५ जणं आमच्या वर्गातून आजवर place झाली आहेत. 


२/८/२०१७

आज Mu Sigmaचा पुढचा राउंड होता. ही कंपनी नको असल्याने नेमकं कुठल्या राउंडला बाहेर पडावं असा विचार चालू होता. सुरुवातीला synthesis round होता. त्यात eliminationच नसल्याने मी पुढच्या Group discussionच्या राउंडला दाखल झालो. त्यात आम्हाला एक केस स्टडी दिला होता. खूप काही सुचत असूनही अगदी २-३ वाक्य बोलून मी बाहेर आलो. अपेक्षेप्रमाणे reject झालो.
Reject झाल्यामुळे आनंदात असलेला मी एकमेव प्राणी होतो. आता बहुदा in-sem परिक्षेनंतरच पुढच्या कंपन्या येतील.


१३/८/२०१७

काल in-sem ची परीक्षा संपली. परीक्षा चालू असतानाच 3dPLM, Searce Logistics आणि MediaOcean अशा ३ कंपन्या आल्या. पैकी Searce कंपनी चे reviews अत्यंत वाईट असल्याने (CLSA नंतर आलेली अक्कल-apply करण्यापूर्वी reviews वाचावेत!) मी apply करण्याचं टाळलं. Eligible असूनही apply न केलेली ही पहिलीच कंपनी. 3dPLM कंपनी चांगली वाटते. २१ ऑगस्ट ही recruitment date आहे. Mechanical, Production इत्यादी क्षेत्रात लागणारी software बनवणं हे ह्या कंपनीचं मुख्य काम आहे.
MediaOcean खूपच चांगली कंपनी आहे, पण त्यांचे criteria विचित्र आहेत. त्यांना YD झालेली मुलं चालतात; पण dead ATKT असलेली चालत नाहीत. अशामुळे मी ह्या सोन्यासारख्या कंपनीला eligible होऊ शकलो नाही. 


२२/८/२०१७

काल 3DPLM (Dassault Systèmes) ची recruitment होती. आमच्या placement office ने नेहमीप्रमाणेच मोघम आणि अपुऱ्या सूचना दिल्याने सगळ्यांनीच २१ला aptitude आणि २२ला interview असेल असा समज करून घेतला. पण कंपनीने बहुदा एकाच दिवसात सगळा धडाका लावायचं ठरवलं होतं. २ वाजताच्या pre-placement talk मध्ये त्यांनी आजच aptitude test घेऊन, लगेच शॉर्टलिस्ट करून interview सुद्धा घेणार असं जाहीर करून टाकलं. एकतर अँटिट्यूड परीक्षा सुरु व्हायलाच तीन-साडेतीन वाजले. त्यामुळे interview साठी शॉर्टलिस्ट होणाऱ्यांना पार रात्र होणार हे उघडच होतं.

Aptitude मध्ये २ भाग होते. पहिल्या भागात खूप सोपे प्रश्न पण खूप कमी वेळ होता. दुसऱ्या भागात थोडे अवघड प्रश्न पण खूप जास्त वेळ होता. असल्या टेस्ट्सचा एक तोटा असतो. आपण नक्की कसं perform केलंय ह्याचा अंदाज आपल्यालाच येत नाही. किती लोकं shortlist करणार वगैरे तर माहितीच नसतं. त्यामुळे test झाल्यावर बसून राहण्याशिवाय काही उपायच नसतो.
तासाभराने मित्राचा फोन आला. मी पुढच्या राऊंडसाठी select झालो होतो. बाहेर अंधार पडायला आला होता आणि थोडाफार पाऊस सुरु होता. पुढचा राऊंड म्हणजे थेट interview असणार होता.

पहिला job interview!! I found myself sitting next to a person wearing black T-shirt and staring at me. प्रचंड मोठा आणि कंटाळवाणा फॉर्म भरून, तासभर वाट बघून अखेर माझा interview सुरु झाला. सुरुवातीला काही expected प्रश्न विचारून झाल्यावर त्यांनी मला एक algorithm लिहायला सांगितला. Algorithm ऐकून मला जरा बरं वाटलं. एकतर फारच अनपेक्षितरित्या हा interview समोर आल्याने मी काहीही तयारी न करता त्यांच्या समोर येऊन बसलो होतो. Computer Science मधल्या concepts किंवा काही ठराविक algorithm strategies वगैरे कितीही येत असले तरी एखाद्या तरी revision शिवाय त्याविषयी फारसं बरं, convincing वगैरे बोलता येत नाही. परत concept समजावता आली तरी types, characteristics, features, exceptions, merits-demerits वगैरे theory exam छाप प्रश्न दांडी उडवतात. त्यापेक्षा algorithm लिहिणे हा बऱ्यापैकी safe game आहे. चला! सुरुवात तर बरी झाली.

अजून थोडे technical प्रश्न (जे इथे लिहिण्यात फारसा अर्थ नाही; इच्छूकांनी संपर्क साधावा.) विचारून झाल्यावर एक puzzle विचारण्यात आलं. त्यावर मी अगदीच काहीतरी फालतू उत्तर दिलं. ते पाहून बहुदा त्यांनी मला आणखी असल्या गोष्टी विचारण्याचा मोह टाळला असावा, कारण त्यानंतर interviewच्या शेवटाकडे वाटचाल सुरु झाली. अजून थोडे technical प्रश्न (जे मला 'theory-exam-छाप' वाटून मी टोलवून दिले) विचारून झाल्यावर थोडंफार इकडचं तिकडचं विचारून मला सोडण्यात आलं. काहीसा मिश्र अनुभव आल्याने ह्याही राऊंडला कुठलंच ठाम मत प्रदर्शित करण्यास मी असमर्थ ठरलो. आजच्या दिवसात उरलेल्या लोकांचे interview झाल्यावर result declare करतील. 


२३/८/२०१७

आज सकाळी 3DPLMचा मेल आला. आमच्या कॉलेजमधून ३ जण select केले. मी select झालो नाही. आता interviewवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ह्यावेळेच्या interview ची तयारी करायला वेळच मिळाला नाही, पण असे सारखे होता कामा नये. आजवर मी ५ कंपन्यांना apply केलं. त्यातल्या ३ कंपन्यांच्या aptitude clear करू शकलो. उरलेल्या २ पैकी eQची सोपी होती, पण मी स्वतःच्या हाताने चुका केल्या. असो!

एक नवीन कंपनी आली. 'NICE'. थोडीफार माहिती काढून apply करून टाकलं. २८ तारखेला recruitment आहे. 


२९/८/२०१७

मध्यंतरी Accenture कंपनी आली. Mass recruiter! Apply करून टाकलं.

काल NICEची recruitment होती. भल्या पहाटे ७:३० ला बोलावलं होतं. इतक्या लवकर कॉलेजमध्ये फार फार तर morning walkवाले असतात. कंपनीने साधारण २५० लोकांना शॉर्टलिस्ट केलं होतं. डिप्लोमावाल्या कुठल्याच पोरांना घेतलं नव्हतं. सकाळी pre-placement talk झाल्यावर online test घेण्यात आली. ह्या टेस्ट मध्ये Aptitude सोबतच heavy technical चा समावेश होता. त्यांनंतर एक code सुद्धा करायला देण्यात आला. मला ह्या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी सोप्या गेल्या आणि as a result मी interviewसाठी दाखल झालो.

दुपारी १ वाजता खरं तर Accentureचा PPT (pre-placement talk) होता. पण नेमकं तेंव्हाच NICE चा interview आल्याने PPT बुडवावा लागला. आधी आम्हाला एक फॉर्म भरायला देण्यात आला. तो भरून झाल्यावर एकेकाला बोलवू लागले. माझं नाव येईपर्यंत ५:१५ वाजले. अखेर मला आत बोलावण्यात आलं. थोडे इकडचे तिकडचे timepass प्रश्न विचारून झाल्यावर त्यांनी मला technical प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रोजेक्टबद्दल विचारून झाल्यावर त्यांनी मला काही basic पण अवघड असे प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरं मला आली नाहीत. शेवटी 'कळवतो' सांगून आणि एक पेनड्राईव्ह gift म्हणून देऊन (जो चालत नाहीए!!) मला जायला सांगण्यात आलं. मी एकंदरीत दिलेल्या उत्तरांबद्दल जाणीव असल्याने मी काही select होत नाही ह्याची मला खात्री होती. झालंही तसंच. थोड्याच वेळात आतून 'जाऊ शकता' असा निरोप आला. 

NICE मधून reject झाल्याचा दुसरा अर्थ असा, की आता थेट Accentureला बसावं लागणार. Mass recruiter company मध्ये जाण्याची माझी फार मनापासून इच्छा नाहीए. पण ही सोडली आणि पुढे कुठली मिळाली नाही तर पश्चातापाची वेळ येईल. 

Accentureच्या आधी एखादी कंपनी यावी असं मला आज सकाळपासून फार वाटत होतं, आणि झालंही तसंच. दुपारी एकदम २ कंपन्या आल्या. Robert Bosch आणि ION trading India pvt. ltd. पण दोन्ही कंपन्यांची माहिती काढता, अपेक्षाभंग झाला. Robert Bosch पुण्यात नाही, त्यामुळे applyच केलं नाही. IONचं package १२ लाख आहे आणि ६ राउंड्स आहेत. दुसऱ्या राउंड नंतर पुढच्या राऊंड साठी नोएडाला जावं लागणार आहे. ह्याचा सरळ सरळ अर्थ असा, कि पहिला आणि दुसराच राऊंड crack करणं प्रचंड अवघड असेल. Apply करून टाकलं. 


२/९/२०१७

आज मी apply केलेल्या कुठल्याच कंपनीची टेस्ट नाही, किंवा नवीन कंपनी सुद्धा आली नाही. आज काही वेगळंच लिहायचं आहे. Accenture आल्यापासून माझ्या मनात एक अभूतपूर्व गोंधळ चालू आहे. To be or not to be! Mass recruiter कंपनीत जाण्याची कुणाचीच मनापासून इच्छा नसते. ६-६ महिने joining होत नाही, मनासारखं काम मिळत नाही, मनासारखा पगार मिळत नाही, कधीही बेंच वर जाण्याची टांगती तलवार असते इत्यादी कारणं त्यामागे असतात. सर्वात पहिली कंपनी येण्याआधी जर मला कुणी सांगितलं असतं की पहिली mass recruiter येण्यापूर्वी तू eligible असशील अशा किमान १० तरी कंपन्या येणार आहेत, तर मी '१० पैकी एकात तरी नक्कीच प्लेस होईन' अशा प्रकारचा आशावाद दाखवला असता. पण आज जेंव्हा जवळपास ८-९ कंपन्या येऊन गेल्या, आणि त्यातल्या ६ कंपन्यांना मी बसलो, तेंव्हा अजून एखादी कंपनी Accenture च्या आधी यावी असं का वाटतं आहे?

Accenture कडे दुर्लक्ष करून चांगली कंपनी येण्याची वाट पाहणे हा एक सरळ उपाय माझ्याकडे आहे. पण ते काहीसं हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागल्यासारखं होईल. दुसरा मुद्दा म्हणजे, Accenture सोडण्याचा अर्थ हा त्यांच्यासारख्याच दुसऱ्या कंपन्या म्हणजेच Infosys, Wipro, TCS, Cognizent, IBM इत्यादी सुद्धा सोडणे असा होतो. कारण जर Accenture सोडली तर ह्या कंपन्या Accenture पेक्षा कुठे उजव्या आहेत असा प्रश्न निर्माण होतो. माझं असं आजिबात मत नाही, कि ह्या सगळ्या कंपन्या वाईट आहेत वगैरे... पण fresher level ला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते, which is experience, तो कदाचित चांगला मिळणार नाही अशी भीती वाटते.

ही द्विधा मनस्थिती कायम ठेऊन मी Accenture ला मनापासून सामोरं जाण्याचा पर्याय निवडला आहे. eQ किंवा 3DPLM मध्ये प्लेस झालो असतो तर जितका आनंद झाला असता तितका नाही होणार कदाचित, पण कुठेच प्लेस न झाल्याच्या दुःखाला तरी तोंड द्यावं लागणार नाही. मधला मार्ग कायमच सोयीस्कर असतो का?


४/९/२०१७

आज IONची test होती. Aptitude आणि technicalचे प्रश्न बऱ्यापैकी सोपे होते. त्यानंतर ३ code करणं अपेक्षित होतं. त्या codes मध्ये माझ्या बारीकसारीक चुका झाल्या, आणि वेळही कमी पडला. एवढं सगळं होऊनही आशा ठेवायला हरकत नव्हती, पण ह्यानंतरचा interview cancel करून direct नोएडाच्या राऊंडसाठी शॉर्टलिस्ट करणार असं कंपनीने सांगितल्याने अगदीच एखाद-दुसऱ्या कुणाला तरी घेतील. असं असल्यामुळे काही chances नाहीत. असो! तसंही ही कंपनी मिळणार नव्हती. All eyes on Accenture now!


८/९/२०१७

आज Accentureची test होती. ११०० पेक्षा जास्त candidates होते. Testमध्ये Verbal, Analytical आणि Quantitative असे ३ sections होते. मला हि टेस्ट बऱ्यापैकी चांगली गेली. संध्याकाळी मेल आला. सिलेक्ट झालो. उद्या interview. 


९/९/२०१७

जाऊदे! आता पुढच्या कंपनीची वाट बघायची... 


११/९/२०१७

आज IBM कंपनी आली. प्रथमदर्शनी चांगली वाटली, पण काहीच क्षणांत लक्षात आलं की ही 'dream status' असलेली कंपनी आहे. MITमध्ये dream कंपनी असा प्रकार असतो. त्याचा अर्थ असा, की त्याआधी जरी कुठल्याही कंपनीला recruit झालं असेल, तरी 'dream' कंपनीला बसता येतं. अर्थात कुठली कंपनी 'dream' असावी हे ठरवण्याचे अधिकार Placement officeलाच असतात!

कुणी जर ड्रीम कंपनीत place झाला, तर त्याला पुढे कुठेच कधीच बसता येत नाही. असल्या 'dream' कंपन्यांचं package साधारण ७ ते ८ लाखांच्या वर पार २२-२३ लाखांपर्यंत असतं. त्यामुळे एकदा कुणी असल्या कंपनीत प्लेस झाला, की तो दुसरा विचारही करत नाही.

IBM चं तसं नव्हतं. ही कंपनी जरी ड्रीम असली, तरी हिचं package ३.२ लाख इतकंच होतं. IBMला प्लेस झालं तर पुढे दुसऱ्या कुठे बसताही येणार नाही. IBMचं job location सुद्धा 'PAN India' म्हणजेच 'Presence Across Nation' असं आहे. सध्यातरी apply न करण्याच्या विचारात आहे. 


१३/९/२०१७

काल Harbinger नावाची कंपनी आली. माझ्या घराजवळच ऑफिस आहे. कंपनी खूपच छान आहे, पण package फक्त ३ लाख आहे. मी package चा विचार करायचा नाही हे आधीच ठरवलं होतं. कंपनी चांगली असल्याने apply करून टाकलं. 

आज Persistent (dream) कंपनी आली. ही कंपनी कोण सोडेल? इतक्या चांगल्या कंपनीला लगेच apply करून टाकलं. Harbinger १६ तारखेला, तर Persistent १९ ला आहे. कुठलीही मिळाली तरी चालेल. Rather आवडेल. 


१६/९/२०१७

२ दिवसांपूर्वी Cybage आणि capgemini अशा २ कंपन्या आल्या. Cybage छानच कंपनी आहे. तिला लगेच apply करून टाकलं. Capgeminiची भारतात कुठेही काम करावं लागेल अशी सूचना आहे. त्यांच्या branches सुद्धा खूप आहेत. त्यामुळे पुण्यात मिळण्याची शक्यता कमीच आहे. ह्या कारणास्तव मी apply करण्याचं टाळलं.

आज Harbinger (हार्बिन्जर) कंपनीची टेस्ट होती. कंपनीवाले college मध्ये न येता आम्हालाच त्यांच्या पाषाणाच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. दोन-अडीच तासाच्या प्रदीर्घ कंटाळवाण्या PPT नंतर टेस्ट घेण्यात आली. थोडे MCQ आणि थोडे programs विचारण्यात आले. मला बऱ्यापैकी आलं. पुढच्या राऊंडला जाणार कि नाही हे कंपनीच्या requirementवर अवलंबून आहे. 


१८/९/२०१७

११:३०ला अपेक्षित असलेला Harbingerचा मेल २ वाजता आला. मी select झालो नाही. एकंदरीत processमध्ये मला जरा गौडबंगाल वाटतं आहे. Resultचा मेल काही जणांना आलाच नाही. एकूण १ ते १८१ असे रोल नंबर ठरवण्यात आले होते त्यातल्या १ ते १०७ मधल्या ३० जणांना सिलेक्ट करण्यात आलं तर १०८ ते १८१ मधल्या एकालाही नाही. (माझा नंबर १२८ होता)

असो! आता काही होऊ शकत नाही. उद्या Persistent कंपनी आहे. अवघड असणार आहे. Let us see!


१९/९/२०१७

आज सकाळी Persistentच्या परीक्षेच्या आधी Harbingerचा मेल आला. १०८ ते १८१ मधल्या लोकांची लिस्ट होती. मी सिलेक्ट झालो. दुपारी २ वाजता interview असणार होता.

त्याआधी Persistentची aptitude test होती. त्यातले technical प्रश्न आणि code अवघड होते. Aptitude आणि essay सोपे होते.

दुपारी interview होता. पाषाणला जायचं होतं. भयंकर पाऊस पडत होता. गाडी तिथेच लावून कॅबने पाषाणला गेलो. थोड्या formalities झाल्यावर interviewसाठी बोलावण्यात आलं. Interviewमध्ये शक्य असलेले सगळे प्रश्न विचारण्यात आले. गेल्या ४ वर्षांत जे काही शिकलो ते जवळपास सगळं interviewमध्ये विचारण्यात आलं. काही प्रश्नांची उत्तरं येत होती, पण काही प्रश्नांची आलीच नाहीत. थोड्या वेळाने reject झाल्याचं सांगण्यात आलं.

नंतर घरी परत येताना Persistentचा मेल आला. त्यातही मी select झालो नाही. हे काहीसं आश्चर्यजनक होतं, पण सत्य होतं.


२१/९/२०१७

बहुतेकवेळा interviewमध्ये resumeवर आधारित प्रश्न विचारले जातात. Resumeमध्ये ज्या कौशल्यांचा उल्लेख आहे अशांवरच प्रश्न असतात. फारच कमी technical skills असल्यास interviewer कडून नाराजी व्यक्त केली जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो सर्वांचा जास्तीत जास्त skillsचा समावेश करण्याकडे कल असतो. पण काहीवेळा आपल्याला एखादी गोष्ट एकदम बेसिक येत असताना आपण ती resume मध्ये लिहिली आणि interview मध्ये त्यावर खोलात प्रश्न विचारले गेले तर आपली फेफे उडू शकते.

काही कंपन्या झाल्यावर या गोष्टी सर्वांच्याच लक्षात येऊ लागल्या. यावर उपाय म्हणून काही लोकांनी काही गोष्टी resumeमधून काढून टाकल्या. मलाही माझ्या resumeमधून Java, Python, R, JavaScript, PHP इत्यादी गोष्टी काढून टाकण्याचे सल्ले मिळू लागले. मीही असं करण्याचा seriously विचार करू लागलो. ह्याचा विचार करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. Resume मध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची किमान तोंडओळख तरी मला नक्कीच होती. काही skills मी पूर्वी वापरली होती, पण आता आठवत नव्हती. अशा परिस्थितीत या गोष्टी resume मधून काढून टाकण्यापेक्षा नीट शिकून का घेऊ नयेत? मला सुरुवातीपासून सगळं सुरु करण्याची गरज नव्हतीच. फक्त interviewच्या दर्जाचा अभ्यास तयार असण्याची गरज होती. मग तो अभ्यास मला जड आहे का? आणि आत्ता केलेला अभ्यास कधीतरी उपयोगी पडेलच. अशा भावनेने मी resume मधल्या सगळ्या skillsचा खोलवर अभ्यास करायला सुरुवात केली. NICE आणि Harbingerच्या interview मध्ये मला ह्या अभ्यासाचा नक्कीच फायदा झाला. Resumeमधून skills वजा करण्याची पळवाट टाळल्यामुळे मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता आली.

आता पुढची कंपनी Cybage!


२३/९/२०१७

आज Cybageची aptitude होती. Aptitude मध्ये general quantitative, essay आणि technical असे ३ sections होते. Essay as usual सोपा गेला. Quantitative आणि verbal च्या section मध्येसुद्धा काहीच अवघड नव्हतं. Technicalचा थोडा अवघड होता, पण मला बऱ्यापैकी जमले.

तासाभरात लगेच मेल आला. साधारण २६० लोकांपैकी १२३ पुढच्या राऊंडला सिलेक्ट झाले होते. मी सिलेक्ट झालो. आता सोमवारी interview!


२५/९/२०१७

आज सकाळी ९ वाजताच Cybageच्या interview साठी बोलावलं होतं. धावतपळत ९च्या आधीच ऑडिटोरिअम मध्ये पोहोचलो. फारसं कुणीच आलं नव्हतं. Interviewची process साधारण १०:१५ ला सुरु झाली. आधी technical interview होता. Technical interview साठी ९ पॅनेल्स तयार करण्यात आली होती. साधारण १४-१५ लोकं प्रत्येक पॅनलमध्ये होते. माझा technical interview व्हायला १ वाजला. Interview मध्ये resume मध्ये असलेली प्रत्येक गोष्ट विचारण्यात आली. C पासून C++, Python, Java, HTML, PHP, CSS, JavaScript, R, SQL, Linux commands, data structures वगैरे सगळ्या गोष्टींवर प्रश्न आले. बऱ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊन मी बाहेर आलो. ५च मिनिटात मी HR round साठी सिलेक्ट झाल्याचा निरोप आला.

Accenture मध्ये HR interviewला solid माती खाऊन आल्यावर मी जरा शहाणा झालोय. HR ची पण तयारी करायची असते हे तेंव्हाच लक्षात आलं होतं. त्यामुळे मी यावेळी mentally prepared होतो. साधारण ३ वाजता माझा interview घेण्यात आला. ३ मुली आणि मी असा ४ जणांचा एकत्र interview होता. अर्धा interview झाल्यावर मला बाहेर जायला सांगितलं. उरलेल्या तिघींचा interview चालूच ठेवला. ह्याची मला थोडी भीती वाटली. पण मी काहीच चुकीची किंवा बावळटसारखी उत्तरं दिली नव्हती त्यामुळे मी थोडा निर्धास्त होतो.

सगळ्यांचे interview होईपर्यंत रात्र झाली. खूप वाट बघून झाल्यावर साधारण ८:३० वाजता results आले. Placement coordinatorच्या हातात resultचा कागद पाहून धडधड वाढू लागली. एकेक नाव वाचायला सुरुवात झाली. तिसरंच नाव माझं आलं. As a reflex माझ्या चेहऱ्यावर एक smile उमटलं. आतून खूप आनंद झाला होता. कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. एक मोठ्ठं काम झाल्याचं समाधान वाटत होतं.


फलश्रुती 

प्लेसमेंट झाल्यावर घरी जातानाची भावना शब्दात नाही वर्णन करता येत! १० मिनिटांच्या रस्त्यात १० वर्षं आठवतात. प्रबोधिनी, दहावी, एस. पी., बारावीत असताना चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी केलेली धडपड, MIT मिळाल्यावर झालेला आनंद, पहिल्या वर्षी मिळालेले चांगले आणि नंतर प्रत्येक वर्षी कमी कमी होत गेलेले मार्क्स, प्लेसमेंटसाठी केलेली धडपड, कंपन्यांची माहिती काढणं, वेगवेगळे interview देणं, प्रत्येक interview मध्ये नवीन चुका करणं, मग त्या चुका परत होऊ नयेत ह्यासाठी त्यावर काम करणं, मनापासून हव्या असलेल्या कंपनीने रिजेक्ट केल्यावर निराश होणं, नवीन कंपनी आल्यावर नव्या जोमाने परत तयारीला लागणं आणि अखेरीस एका चांगल्या कंपनीत प्लेस होणं!

त्यादिवशी मी ऑफर लेटर घेऊनच घरी आलो. एव्हाना कॉलेजमधल्या सगळ्यांना, घरच्यांना वगैरे कळलं होतं. कौतुकाचा वर्षाव सुरु होता. खूप फोन येत होते, खूप मेसेज येत होते. अशावेळी काहीसं अंतर्मुख व्हायला होतं. Do I really deserve this? असा प्रश्न मनात येत राहतो. पण मनातल्या मनात आपण काहीतरी खरंच उल्लेखनीय केल्याची जाणीव असते. फक्त आणि फक्त आनंदाच्या भावनेत आपण न्हाऊन निघत असतो.

त्या रात्री खूप वेळ झोप आली नाही. खूप विचार मनात येत होते. पुढे काय काय होणार आहे, कंपनी कशी असेल, कॉलेज च्या phaseमधून कंपनीत जाताना कसं वाटेल? खूप गोष्टी डोक्यात गर्दी करत होत्या. खूप घटना, खूप लोकं आठवत होते. खूप गोष्टी सुचत होत्या.

कधीतरी उशिरा झोप लागली. दुसऱ्या दिवशी कसलीतरी नवीन सुरुवात झाल्यासारखं वाटत होतं. नव्या शक्यतांच्या जगात मी झेप घेतली होती. परत कधीच मागे वळून न पाहण्यासाठी... 

Image Source: Internet


Contact Form

Name

Email *

Message *